Thursday 1 September 2022

Early India 1. प्रारंभिक इतिहास : अर्थ व महत्व

 प्रकरण १

साधने व प्रागैतिहासिक काळ

----------------------------------------------

अ. प्रारंभिक इतिहासाचे महत्व

ब. इतिहासाची साधने :

१. पुरातत्वीय साधने, २. आलेख(शिलालेख, गुफालेख)

३. नाणी, ४. वान्डगमयीन साधने, ५. परकीय प्रवासवर्णन

क. प्रागैतिहासिक काळ : १. अश्मयुगीन संस्कृती (पुराणाश्मयुग, मध्यामश्मयुग व नवाश्म युग) व  २.ताम्रापाषणयुगीन संस्कृती

 -----------------------------------------------------------

अ.             प्रारंभिक इतिहास : अर्थ व महत्व 

 a.          इतिहास म्हणजे काय?

‘इतिहास’ या शब्दाला इंग्रजीमध्ये ‘History’ हा शब्द वापरला जातो. ‘History’ हा इंग्रजी शब्द ‘Historica’ या ग्रीक शब्दापासून आला आहे. ज्याचा अर्थ ‘चौकशी करणे’, ‘स्पष्टीकरण करणे’, ‘माहिती देणे’ असा होतो (to enquiry, to explain, to inform) असा होतो.

तर ‘इतिहास’ हा मराठीतील शब्द मुळात संस्कृत शब्द आहे ज्याचा अर्थ ‘असे असे घडले’ असा होतो.

‘इतिहास’ ही संकल्पना काही व्याख्यांच्या आधारे समजून घेता येईल.

इतिहासाच्या प्रमुख व्याख्या पुढीलप्रमाणे :

१. हिरोडोटस (‘इतिहासचा जनक’ Father of History)- : इतिहास म्हणजे भूतकाळातील मनोरंजक व संस्मरणीय घटना होय.

२. रँके (आधुनिक इतिहासलेखानाचा जनक -Father of modern History Writting) : ‘History is Science no less no more’ ‘इतिहास म्हणजे दुसरे-तिसरे काही नसून विज्ञान आहे’.

३. जॉन सिली यांच्या मते, ‘इतिहास म्हणजे भूतकाळातील राजकारण व वर्तमानकाळातील राजकारण म्हणजे भविष्यातील इतिहास होय’ (History is Past Politics and Present Politics is History in future)

४. रेनियर याच्या मते, ‘इतिहास म्हणजे, समाजात राहणाऱ्या मानवाची कहाणी’ होय.

५. थोर विचारवंत कार्ल मार्क्सच्या मते, ‘आजपर्यंतचा इतिहास हा आहेरे व नाहीरे वर्गातील वर्गसंघर्ष होय’.

६. थोमास कार्लाईल म्हणतो, इतिहास म्हणजे थोर व्यक्तींची चरित्रे व आत्मचरित्रे होय.

७. फ्रान्सिस बेकन याच्या मते   इतिहास म्हणजे मानवाला शहाणी बनवणारी विद्याशाखा होय.

८. लोर्ड अक्टन इतिहास म्हणजे मानवी स्वातंत्र्याची कहाणी होय.

९. अर्नाल्ड टॅायंबी इतिहास म्हणजे संस्कृतींचा उदय, विकास व ऱ्हास होय. (History is rise, development and decline of culture.)

१०. ई. एच .कार - इतिहास म्हणजे भूतकाळ व वर्तमानकाळ यांचा कधीही न संपणारा सवांद होय. History is unending dialogue between Past and Present.

इतिहासाची एक परिपूर्ण अशी व्याख्या नाही वारी सर्व व्याख्या इतिहासाच्या वेगवेगळ्या अंगाना स्पर्श करतात. थोडक्यात इतिहास म्हणजे, ‘भूतकाळातील राजकारण, समाजजीवन, आर्थिकजीवन, धर्म, संस्कृती असा सर्वांगीण घटकांचा पद्धतशीरपणे केलेला अभ्यास होय.’ (History is systematic study of past events )

 b.  प्रारंभिक इतिहास म्हणजे काय?

{-EARLY HISTORY -इसपू ३००० ते इ.स. १२००}

·                इतिहासाची विभागणी प्राचीन, मध्ययुग व आधुनिक अशी पारंपरिकरित्या केली जाते. त्यातील प्राचीन काळालाच प्राचीन काळाला सुप्रसिद्ध इतिहास संशोधिका रोमिला थापर यांनी ‘प्रारंभिक इतिहास’ ‘Early History’ असाही शब्द वापरता.

·                ‘प्राचीन’(Ancient) या शब्दाचा अर्थ ‘जुना’ असा होतो. इतिहासात तो फक्त जुना काळ या अर्थाने वापरलेला नाही.

·                 “सरंजामशाही सुरु होण्यापूर्वीचा काळ ‘प्रारंभिक काळ’ म्हणून ओळखला जातो.”

·                भारताच्या इतिहासात इ.स. ६४५ पूर्वीचा काळ ‘प्रारंभिक  काळ’ मानला जातो. कारण इ.स. ६४५च्या नंतर भारतात सरंजामशाहीचा उगम झाला.

·                तर काही इतिहासकार इ.स. १२०० पूर्वीचा काळ प्रारंभिक  काळ मानतात.

·                प्राचीन किंवा प्रारंभिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात पुढील घटकांचा समावेश केला जातो :

१.हडप्पा संस्कृती(इ.स.पु.३००० ते इ.स.पु.१७५०)

२. वैदिक संस्कृती(इ.स.पु.१५००ते इ.स.पु.६००)

३. महाजन पदांचा काळ किंवा बौध्द काळ( इ.स.पु. ६ वे शतक

४. मौर्य साम्राज्य(इ.स.पु.३२१ ते इ.स.पु.१८६)

५. शुंग, कुशाण व सातवाहन घराणे(इ.स.पु. २०० ते इ.स. २००)

६. गुप्त साम्राज्य(इ.स. ३२० ते इ.स. ५५०)

७ हर्षवर्धनाचा काळ(इ.स. ६०५ ते इ.स. ६४५)

८. चालुक्य घराणे, पल्लव घराणे, राष्ट्रकुट घराणे,

इ. घराणी, त्यांच्या राजकीय घटना, सामाजिक,आर्थिक, धार्मिक, सांस्कृतिक जीवनाचा अभ्यास केला जातो.

c. प्रारंभिक इतिहासाचे महत्व :

१. मानवाची वाटचाल समजून घेण्यासाठी उपयुक्त :

भूतकालातील मानवाची वाटचाल समजून घेण्यासाठी प्रारंभिक भारताचा अभ्यास उपयुक्त ठरतो. मानवाची उत्क्रांती, ‘शिकार ते शेती’ असा झालेला प्रवास, यातून त्याच्या जीवनात झालेला बदल समजून घेण्यासाठी प्रारंभिक भारताचा इतिहास उपयोगी आहे. ‘शेतीचा शोध’ हा मानवी जीवनातील एक क्रांतीकारक शोध आहे. ज्याचा उल्लेख ‘कृषी क्रांती’ असा केला केला जातो. शेतीचा शोध कसा लागला? माणूस शेती का करू लागला? शेती करायला लागल्यामुळे माणूस कसा स्थिर झाला. विविध व्यवसायांचा उदय कसा झाला. व्यापार कसा सुरु झाला. शहरे कशी अस्तित्वात आलीत. त्यामुळे मानवी जीवन कसे बदलेले. याची माहिती प्रारंभिक भारताच्या अभ्यासातून कळेल.

सुरुवाताच्या काळात मानवाने नैसर्गिक साधनसंपत्तीचा शोध कसा घेतला. त्याचा वापर कसा केला. याशिवाय त्याने आपल्या उपजीविकेची साधने कशी शोधून काढली याची माहिती मिळू शकेल.

शेतीची अवजारे बनवणे, भांडी तयार करणे, कापड तयार करणे, धातू शुद्ध करणे, त्यापासून वस्तू बनवणे, अलंकार बनवणे, लाकडी वस्तू तयार करणे(सुतार काम) इ. हे व्यवसाय का उदयास आले, त्यामुळे मानवानाचे जीवन कसे बदलले हे प्रारंभिक भारताच्या अभ्यासातून लक्षात होईल

२.भाषा व लिपी यांचा उदय व विकास समजून घेण्यासाठी:

कोणताही समुदाय सुसभ्य तोपर्यंत समजला जात नाही जोवर त्याला लेखनकला माहिती असत नाही. प्रारंभिक भारतातच्या इतिहास मानवाने अनेक लिपी(script) शोधून काढल्या आहे. आज आपण मराठी, हिदी, संस्कृत, गुजराथी, इ. भाषा ज्या देवनागरी लिपीत लिहतो. तसेच तमिळ, तेलगु, मल्याळम या द्रविड लिपीत लिहल्या जातात. यांचा शोध प्राचीन काळात लागला. याशिवाय ब्राह्मी, खरोष्ट्री या लिपी व पाली, अर्धमागधी या भाषा सुद्धा प्राचीन काळात शोधल्या गेल्या. एकूणच भारतातील भाषा व लिपी यांचा उदय विकास याची माहिती प्रारंभिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासातून होईल.

३. भारतीय समाज समजून घेण्यासाठी:

आजच्या भारतीय समाजातील अनेक सामाजिक संस्था व परंपरा यांचा उदय प्राचीन काळात झाली. मुळात भारतीय समाज कसा निर्माण झाला? ‘जात’ म्हणजे काय? वर्ण म्हणजे काय? ती कशी व का उदयास आली? ती नष्ट करण्याची प्रयत्न झाले का? ते कितपत सफल झाले. अस्पृश्यता कशी उदयास झाली. गुलामगिरीची प्रथा होती काय? भारतातील सामाजिक विषमतेची मुळे प्राचीन काळातील सामाजिक रचनेत दिसतात. भारतातील कुटुंबव्यवस्था, विवाहसंस्था व विवाहाचे विविध प्रकार, आहार, विहार, वेशभूषा, मनोरंजनाची साधने, त्यातील विविधता या सर्वांचे आकलन प्रारंभिक भारताच्या अभ्यासातून येईल. आजच्या सामाजिक समस्यांचे आकलन होण्यास मदत होईल.

४. प्रारंभिक काळातील राजकीय जीवनाचा माहिती मिळेल :

‘टोळी ते राज्य’, राजेशाही व गणराज्य, ‘राज्य ते साम्राज्य’, ‘राजेशाही ते सरंजामशाही’ हा भारतातील राजकीय जीवनाचा प्रवास समजण्यासाठी प्रारंभिक भारताचा अभ्यास महत्वाचा आहे. भारतात राज्यांचा उदय का व कसा झाला? कोणती राजघराणी होती? त्यांनी कोणते योगदान दिले? राज्यांचे रुपांतर साम्राज्यात कसे झाले? साम्राज्य म्हणजे काय? विविध घराण्यांचा व साम्राज्याचा ऱ्हास का झाल? सरंजामशाही(सरदारशाही) चा उदय कसा झाला. त्याचा भारताच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक जीवनावर काय परिणाम झाला. याची माहिती प्रारंभिक भारताच्या अभ्यासातून होईल.

५. ‘विविधतेत एकता’(Unity in Equality) हे मूल्य समजण्यासाठी :

          ‘विविधतेत एकता’(Unity in Equality) हे भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. याची सुरुवात प्रारंभिक काळात झाली. भारतात आर्य, ग्रीक, शक, हूण, तुर्क, अफगाण, अशा अनेक जमाती, रानटी टोळ्या आल्या. ज्या भारतात राहिल्या व भारतीय झाल्या. त्यांनी भारतीय संस्कृतीचा स्वीकार केला तसेच त्यात भरही टाकली. समाजव्यवस्था, शिल्पकला, वास्तुकला आणि साहित्य यात या परकीय टोळ्यांनी बहुमूल्य योगदान दिले. 

          भारत अनेक धर्मांचे उगमस्थान आहे. हिंदू, जैन, बौद्ध या धर्मांचा उदय भारतात झाला. या सर्व धर्मांचा परस्परांवर प्रभाव आहे. त्यातून भारतात एक ‘संमिश्र संस्कृती’ विकसित झाली आहे. भलेही लोकांच्या धार्मिक श्रद्धा भिन्न आहे. ते वेगवेगळ्या भाषा बोलतात मात्र ते परस्परांच्या धर्मांचा आदर करतात. त्यातून एक सामान्य जीवनपद्धती विकसित झाली आहे. आपल्या देशात धार्मिक विविधता असूनही त्यात एक खोलवर एकता आहे. हे प्रारंभिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासातून समजून येईल.

६. वर्तमान समस्यांवर उपाय शोधता येतील:

वर्तमानकालीन समस्यावर इतिहासाच्या आधारे उपाय करता येऊ शकते. भारतातील काही जनसमुदाय व त्यांच्या संघटना भूतकाळाचे विशेषत: प्राचीन भारताच्या इतिहासाचे उदात्तीकरण व गौरवीकरण करत आहेत. प्राचीन काळ हा भारताच्या इतिहासातील सर्वात अभिमानास्पद काळ आहे. तो ‘हिंदूच्या प्रभावाचा व प्रगतीचा काळ’ होता. प्राचीन काळात आपण सर्व क्षेत्रात खूप प्रगती केली होती. विज्ञान-तंत्रज्ञानात भारतीयांनी अनेक शोध लावले होते. भारतात विद्यापीठे होती. आपल्याला पाच हजार वर्षांचा इतिहास आहे. आपली संस्कृती फार महान आहे. अशा पद्धतीने इतिहासाची मांडणी लिहिण्यातून व बोलण्यातून करत आहेत.

प्राचीन भारतीय संस्कृतीत काही चांगल्या बाबी निश्चितच होत्या. मात्र प्राचीन भारताचा सर्व इतिहास भव्य-दिव्य, अभिमानस्पद आहे. हे अर्धसत्य आहे. विशेषत: जात, अस्पृश्यता, स्त्रियांची गुलामगिरी यांना प्राचीन काळात सुरुवात झाली. सतीची चाल, बालविवाह, बहुविवाह, विधवांच्या पुनर्विवाहास प्रतिबंध, या चालींना याच काळात सुरुवात झाली. स्त्रिया व बहुजन समाजाला शिक्षणापासून वंचित ठेवले गेले. समाजातील एक मोठा समूह अपमानाचे, गुलामगिरीचे, दुय्यमत्वाचे, मानहानीचे जीवन जगत होता. अन्न व पाणी यासारख्या मुलभूत गरजांपासून तो वंचित होता. हे चांगले व अभिमानस्पद होते असे म्हणता येणार नाही. त्यामुळे प्राचीन काळात सर्व चांगलेच होते याबद्दलची योग्य ती समज प्रारंभिक भारताच्या अभ्यासातून येईल. भारतात विविध धर्माचे लोक राहत होते मात्र त्यांच्यात परस्पर धार्मिक विद्वेषाचे वातावरण नव्हते. जातीय दंगली होत नव्हत्या. धार्मिक सौहार्द हे भारताच्या समाजजीवनाचे मुलभूत वैशिष्टय आहे. हे ध्यानात यायला व वर्तमानकाळातील समस्यांवर उपाय शोधताना प्रारंभिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासाची निश्चित मदत होईल.

काळाच्या ओघात भारतीय समाजात अनेक अंधश्रद्धा व वाईट चालीरीती निर्माण झाल्या. त्या समाजाच्या प्रगतीत अडथळा निर्माण करणाऱ्या आहेत. त्या दूर होणे आवश्यक आहे. इतिहासाच्या अभ्यासातून त्या दूर व्हायला मदत होईल.




No comments:

Post a Comment

Featured Post

previous year question papers

http://www.unipune.ac.in/university_files/old_papers.htm

Popular Posts