Friday 30 September 2022

F. हडप्पा संस्कृतीच्या ऱ्हासाची कारणे

 

प्राचीन जगाच्या इतिहासात इजिप्त मधील इजिप्तशियन संस्कृती, चीनमधील चीनी संस्कृती, मध्य आशियातील मेसापोटेमिया किंवा बॅबिलोनीयन संस्कृती सोबतच भारतातील हडप्पा संस्कृती महत्वाची मानली जाते. या संस्कृतीतील नगररचना विशेषत: सांडपाण्याची व्यवस्था, नगर नियोजन, पक्क्य भाजलेल्या विटांचा वापर, वजनमाप, शेती व व्यापारातील कौशल्य, इ. वैशिष्टे तत्कालीन जगातील इतर कोणत्याही संस्कृतीत आढळत नाही. अशी ही संस्कृती इ.स.पु. १७५० पर्यंत ऱ्हास पावली. ही संस्कृती कोणत्या कारणामुळे नष्ट झाली असेल त्याची कारणे इतिहासकारांनी पुढीलप्रमाणे शोधून काढली आहेत.

१.             आर्यांच्या आक्रमणामुळे :

हडप्पा संस्कृती सिंधू नदीच्या खोऱ्यात होती. हडप्पाच्या ऱ्हासानंतर सिंधू व गंगा नदीच्या खोऱ्यात ‘वैदिक संस्कृती’चा उदय झाला. वैदिक संस्कृतीचे निर्माते आर्य लोक होते. भारतात खैबर खिंडीमार्गे आर्यांचे आगमन इ.स.पु. १५०० नंतर सुरु होते आणि याच काळात हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास होतो. यावरून हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास आर्यांच्या आक्रमणामुळे झाला असेल असा सिंद्धात इतिहासकार मांडतात. त्यांनी आपल्या मताच्या पुष्टीसाठी खालील पुरावे दिले आहेत.


i . आर्य लोक भटके, रानटी, युद्धप्रिय व पशुपालक होते. आर्यांजवळ लोखंडाची हत्यारे व घोडे होते. या दोन्हींची युद्धप्रिय आर्यांना युद्धात मदत होत होती. या आर्यांनी हडप्पा संस्कृतीतील नगरांवर आक्रमण केले असेल व ही नगरे नष्ट झाली असतील असा एक निष्कर्ष इतिहासकारांनी काढला आहे. कारण हडप्पा संस्कृतीतील लोक शांतताप्रिय, व्यापारी होते. त्यांच्याजवळ ब्राँझ(कास्य)ची हत्यारे व अवजारे होती, आर्यांची लोखंडाची हत्यारे सिंधूवासीयांच्या श्रेष्ठ होती. या शांतताप्रिय, ब्राँझची हत्यारे वापरणाऱ्या सिंधूवासियांचा रानटी युद्धप्रिय, लोखंडी हत्यारे वापरणाऱ्या आर्यांसमोर निभाव लागला नसेल.

ii. आर्यांची प्रमुख देवता ‘इंद्र’ होती. इंद्र देवांचा राजा व युद्धाचा देव होता. आर्यांचा प्रमुख ग्रंथ असेलेल ऋग्वेदात इंद्राला ‘पुरंधर’ असे म्हटले आहे. ‘पूर’ म्हणजे ‘नगर’, ‘पुरंधर’ म्हणजे ‘पुरांचा(नगरांचा) विध्वंस करणारा’ होय. ही नगरे हडप्पा संस्कृतीतील होती. असे इतिहासकारांचे मत आहे.

२.             पुरामुळे:



हडप्पा संस्कृती ही सिंधू नदीच्या खोऱ्यात होती. या सिंधू व सहा उपनद्यांना(झेलम, चिनाब, रावी, बियास, सतलज, सरस्वती) तिच्या उपनद्यांना वर्षांतून दोन वेळेस पूर येत होता. एकदा पावसाळ्यात पावसामुळे व दुसऱ्यांदा उन्हाळ्यात हिमालयातील बर्फ वितळून. या पुरापासून आपले रक्षण व्हावे म्हणून हडप्पा संस्कृतीतील शहरांना तटबंदी आहे. पण वारंवार येणाऱ्या महापुरामुळे नद्यांच्या काठावरील शहरे नष्ट झाली असतील किंवा महापुरांना कंटाळून लोकांनी इतरत्र स्थलांतर केले असेल. त्यामुळे शहरे ओस पडली असतील. उदा. सिंधू नदीच्या काठावरील हडप्पा शहर एकावर एक असे सात वेळा वसले आहे. प्रत्येक स्तरावर नदीतील वाळूचे अवशेष सापडतात. त्यावरून हे शहर सात वेळा आलेल्या पुरामुळे वारंवार नष्ट झाली असावी. त्यामुळे हे लोक शहर सोडून इतरत्र राहायला गेले असतील.

३.             दुष्काळामुळे:




हडप्पा संस्कृतीतील जी शहरे नद्यांच्या काठावर होती. त्यातील काही शहरे पुरामुळे नष्ट झाली असे इतिहासकार मानतात. पण जी शहरे नद्यांच्या काठावर नव्हती त्यांना हा पुरांचा सिद्धांत लागू होत नाही. अशी शहरे दुष्काळामुळे नष्ट झाली असावीत. दुष्काळामुळे काही शहरांजवळचे पाण्याचे साठे आटले असतील. त्यामुळे या शहरातील लोकांना इतरत्र स्थलांतर करावे लागले असेल. असा विचार इतिहासकारांच्या एका गटाने मांडला आहे.

४.             भूकंपामुळे :



काही संशोधकांच्या मते भूकंपामुळे ही शहरी संस्कृती नष्ट झाली असेल. एकतर भूकंपामुळे वास्तूंची पडझड झाली असावी. दुसरीकडे भूकंपामुळे नद्यांच्या पात्रात बदल झाला असेल व नद्यांचे पाणी शहरात घुसले असेल व शहरे राहण्यास लायक राहिली नसतील. त्यामुळे शहरातील लोकांनी इतरत्र स्थलांतर केले असावे.

५.             भूगर्भातील हालचालीमुळे:




बऱ्याचवेळा नैसर्गिकरित्या भूगर्भीतील समुद्राची पातळी आत सरकली जाते किंवा समुद्र मानवी वस्तीत आक्रमण करतो. असे हडप्पा संस्कृतीतही झाले असावे, असे काही संशोधकांना वाटते. हडप्पा संस्कृतीची जी बंदरे असणारी शहरे समुद्राच्या काठाला होती, त्यातील काही बंदर असणारी शहरे समुद्र आत सरकल्यामुळे ओस पडली. तर काही शहरे समुद्राने आक्रमण केल्यामुळे नष्ट झाली असावीत. उदा. लोथल(गुजरात)येथे जहाजाची गोदी होती(जहाजाची गोदी म्हणजे जिथे जहाजे तयार, दुरुस्त केले जातात किंवा थांबतात असे ठिकाण.), सद्या हे लोथल समुद्रापासून ५ किमी लांब आहे, याचा अर्थ समुद्र आत सरकारला व लोथल बंदर ओस पडले, लोथल शहर नष्ट झाले.

६.             व्यापारातील घट :



हडप्पा  संस्कृतीतील  शहरे ही व्यापारामुळे निर्माण झाली होती. यामुळे शहरांचे अस्तित्व व्यापारावर अवलंबून होते. आर्यांची आक्रमणे, पूर, दुष्काळ, भूकंप, भूगर्भातील हालचाली या आपत्तींचा परिणाम व्यापारावर झाला असेल. त्यामुळे व्यापाराचे मार्ग बदलले असतील व व्यापारी मार्ग बदलल्याने शहरांमधून होणारा व्यापार थंडावला असेल व शहरे ओस पडली असतील. असा निष्कर्ष सुप्रसिद्ध इतिहासकार इरफान हबीब यांनी काढला आहे.

निष्कर्ष :

वरील चर्चेवरून लक्षात येते कि,

i. हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास हा कोणत्याही एका कारणाने झालेला नाही. काही शहरे आर्यांच्या आक्रमणामुळे, काही शहरे पुरामुळे, काही शहरे भूकंप, भूगर्भातील हालचालीमुळे नष्ट झाली.

ii. शहरे नष्ट झाली असली तरी संपूर्ण संस्कृती एकाच वेळी अचानक नष्ट झाली नाही. या संस्कृतीतील सर्वच्यासर्व लोक एकाच वेळी मृत्युमुखी पडलेले नाहीत.(तसा पुरावा सापडत नाही.) शहरातील इमारती, बंदरे, सारख्या इ. भौतिक बाबी नष्ट झाल्या. पण हडप्पा संस्कृतीतील धर्म, अध्यात्म, शेतीचे ज्ञान, व्यवसायिक कौशल्य, विज्ञान-तंत्रज्ञान, इ. गोष्टी नष्ट झाल्या नाहीत. त्या या शहरातून इतरत्र स्थलांतर केलेल्या लोकांसोबत ग्रामीण भागात नेल्या. शहरे राहायला लायक नसल्यामुळे हे लोक इतरत्र ग्रामीण भागात राहायला गेले असतील व त्यांनी या हडप्पा संस्कृतीतील वरील सर्व बाबी आपल्या सोबत ग्रामीण भागात नेल्या असा निष्कर्ष काढता येऊ शकतो कारण हडप्पानंतर सिंधू नदीच्या खोऱ्यात उत्तर हडप्पा संस्कृती उदयास आल्याचे दिसून येते.

No comments:

Post a Comment

Featured Post

previous year question papers

http://www.unipune.ac.in/university_files/old_papers.htm

Popular Posts