Friday 16 September 2022

युनिट १. ३ : प्रागैतिहासिक काळ : अश्मयुग व ताम्रापाषण युग

 ३. प्रागैतिहासिक काळ : अश्मयुग व ताम्रापाषण युग

I..अश्मयुग :

पुथ्वीची उत्पत्ती ४०० करोड वर्षापूर्वी झाली. तर मानवाचे पृथ्वीवरील अस्तित्व अस्तित्व २० लाख वर्षापासून  आहे   मानवाच्या हाडाचे अवशेष २लाख ५० हजार वर्षापूर्वीचे आहेत. अलीकडे महाराष्ट्रात बोरी या ठिकाणी १४ लाख वर्षापूर्वीचे अवशेष सापडले आहेत. १८६३ साली रॉबर्ट ब्रूस फुट यांना मद्रासजवळ पल्लावरम येथे अश्मयुगीन दगडी हत्यारे सापडली. तेंव्हापासून भारतात प्रागैतिहासिक काळाच्या अभ्यासाला सुरुवात झाली. अश्मयुग हा प्रागैतिहासिक काळातील पहिला महत्वाचा टप्पा आहे.

अ.           अश्मयुग/पाषाणयुग म्हणजे काय?

“माणसाने ज्या काळात हत्यारे तयार करण्यासाठी दगड किंवा अश्म वापरले, त्या काळाला ‘अश्मयुग’ असे म्हणतात.”

“मानवाच्या इतिहासातील इ.स.पु.५ लाख ते इ.स.पु.१००० हा कालखंड अश्मयुग म्हणून ओळखला जातो.”

ब.            अश्मयुगाचे टप्पे : अश्मयुगाचे तीन टप्पे पडतात.

अ.           पुराणाश्मयुग

ब. मध्याश्मयुग

क. नवाश्मयुग

 

A. पुराणाश्म युग व त्याची वैशिष्ट्ये:

 

१. पुराणाश्म म्हणजे काय?

“अश्मयुगाच्या पहिल्या टप्प्याला ‘पुराणाश्मयुग’ असे म्हणतात.”

“इ.स.पु.५लाख ते इ.स.पु.१० हजार या कालखंडाला ‘पुराणाश्म युग’ म्हणतात”

२.शिकाऱ्यांचे युग:

पुराणाश्म युगात सुरुवातीच्या काळात मानव हा  भटका, अन्नशोधक होता. झाडाची पाने, फुले, फळे, कमी पडू लागली. त्याचवेळी माणूस मेलेल्या जनावरांचे मांस खात होता. पुढे तो मोठे मोठे मारून त्यांची शिकार करण्याची कला शिकला. या काळातील मानवाचा जास्तीत जास्त वेळ शिकार करण्यात जात असे त्यामुळे या काळाला ‘शिकाऱ्यांचे युग’ असे म्हणतात.

 

3. समूह करून राहू लागला:

सुरुवातील माणूस एकटा भटकंती करत होता. पण शिकारीमुळे त्याचा एकटेपणा संपला. पुराणाश्म युगात प्राणी आकाराने खूप मोठे असल्याने एकट्याने शिकार करणे शक्य नव्हते. त्यासाठी समूहाची गरज भासू लागली. त्यामुळे पुराणाश्म युगातील माणूस समूह करून राहू लागला.

,भाषेला सुरुवात:

पुराणाश्म युगातील मानव शिकारीमुळे व सुरक्षेसाठी समूह करून राहू लागला. समूह करून एकत्र राहिल्याने त्याने एकमेकाशी संवाद साधण्यासाठी बोलण्याची कला किंवा भाषा विकसित केली. सुरुवातील संकेत विकसित केले. हे संकेत कायम केल्याने विशिष्ट भाषा जन्माला आल्या. जगाच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या भाषा विकसित झाल्या.  भाषा ही पुराणाश्म युगाची सर्वोत्कृष्ट देणगी आहे.

५.अग्नीचा शोध :

अग्नीचा शोध पुराणाश्म युगात लागला. निसर्गात पेटणाऱ्या वनव्यांचे निरीक्षण करून अग्नी कसा पेटवायचा व कसा विझवायचा याची कला पुराणाश्म युगातील मानवाने शिकून घेतली. स्वत:च्या शाररीक शक्तीव्यतिरिक्त मानवाला प्राप्त झालेली पहिली बाह्य शक्ती म्हणजे अग्नी होय. अग्नीची कला शिकून घेतल्यावर प्रकाश व उष्णता मिळवण्यासाठी, जंगली जनावरांना पळवून लावण्यासाठी मानवाने अग्नीचा वापर सुरु केला.

६.    निवासस्थाने :

पुराणाश्म युगातील माणूस दाट झाडीच्या आश्रयाने राहत असे. हा काळ हिमयुग असल्याने थंडीपासून रक्षण व्हावे म्हणून माणूस नैसर्गिक गुहांच्या आश्रयाने राहू लागला. या गुहा शक्यतो पाण्याच्या साठ्याजवळच्या असत.

      या काळात मानवाला शेती करण्याची कला अवगत नव्हती. कारण एकतर त्याला गरज वाटत नव्हती कारण लोकसंख्या कमी होती आणि हिमयुगाच्या थंडीमुळे कृत्रिमरित्या पेरलेली कोणतीही बी उगवणे शक्य नव्हते त्यामुळे पुराणाश्म युगातील मानव हा शेतकरी बनला नाही तो शिकारीच राहिला.


B. मध्याश्मयुग व त्याची वैशिष्ट्ये:

 

१. मध्याश्म युग म्हणजे काय?

‘‘पुराणाश्म व नवाश्मयुग यामधल्या काळात जी संस्कृती अस्तित्वात आली तिला ‘मध्याश्मयुग’ असे म्हणतात.”

“ अश्मयुगातील इ.स.पु. १०हजार ते इ.स.पु. ६हजार या कालखंडास ‘मध्याश्मयुग’ असे म्हणतात”

 

२. पशुपालकांचे युग:

मध्याश्म युगात मानवाने पशुपालन करायला सुरुवात केली. यापूर्वी पुराणाश्म युगात मानवाने शिकार करायला सुरुवात केली. शिकारीचे मांस खाऊन टाकलेले मांसाचे तुकडे, हाडे इतर प्राणी खात असत. काही प्राणी मानवाने खाऊन टाकलेले अवशेष खात काही प्राणी माणसाच्या मागोमाग हिंडू लागले, खूपकाळ मागे हिंडल्यावर या प्राण्यांना माणसांची भीती वाटेनाशी झाली. या प्रक्रियेतून जनवारे माणसाळायला सुरुवात झाली. अशा पद्धतीने माणसाने पाळीव बनवलेला पहिला प्राणी ‘कोल्हा’ होता. जो आज कुत्रा म्हणून परिचित आहे. हा कुत्रा पुढे माणसाला शिकारीत मदत करू लागला. कुत्र्यानंतर रानम्हैस, रानगाय, घोडा इ. प्राणी पाळीव करायला सुरुवात झाली. या प्राण्यांचे मांस व दुध माणसाला अन्न म्हणून मिळू लागले. ही पशुपालानाची सुरुवात होती. मध्याश्मयुगातील मानवाचा बराच वेळ पशुपालनात जाऊ लागला. त्यामुळे मध्याश्म युगाला ‘पशुपालकांचे युग’ असे म्हणतात.

 

३. शिकार व ‘शुद्रास्त्रे’ किंवा ‘लघुअस्त्रे’ :

मध्याश्म युगात मानव छोट्या प्राण्यांची शिकार करू लागला. मध्याश्म युगात वातावरण उबदार झाल्याने हरीण, वनगाय, नीलगाय, काळवीट, जंगली कुत्रा, कासव, मुंगुस इ. प्राण्यांची संख्या वाढली. आता मानव या छोट्या प्राण्यांची शिकार करू लागला. त्यासाठी तो आकाराने छोटी अस्त्रे वापरू लागला. त्याना  ‘शुद्रास्त्रे’ किंवा ‘लघुअस्त्रे’ म्हणतात. या शिकारीत त्याला कुत्र्याची मदत होऊ लागली. धनुष्यबाण, सुरा, चाकू, बाणाची टोके, मासे पकडण्याचे गळ इ. गोष्टींचे जनकत्व मध्याश्मयुगातील मानवास द्यावे लागते.

 

 ४. मांस भाजू खाऊ लागला:

मध्याश्म युगात मानव मांस बाजून खाऊ लागला. भाजलेले मांस हे कच्च्या मांसापेक्षा अधिक चविष्ट व रुचकर लागते हे माणसाच्या ध्यानात आले. यापूर्वी त्याने अग्नी पेटवण्याचे व विझवण्याचे तंत्र शिकून घेतले होते. त्याआधारे तो आता मांस भाजून खाऊ लागला. कोणत्याही काळात माणसाला लागलेला शोध जर त्याला उपयुक्त वाटत असेल तर मानव तो शोध पुढच्या काळात वाहून नेतो. तसेच त्याचा इतर वेगळा उपयोगही शोधतो. पुराणाश्म युगात मानवाने अग्नीचा शोध लावला. आता मध्याश्म युगात मानवाने या अग्नीचा वापर करून मांस भाजायला सुरुवात केली.

 

५.दफन करायला सुरु :

या काळात माणूस मेलेल्या माणसाचे दफन करू लागला. अनेक ठिकाणी दफन केलेले मृतावशेष सापडले आहेत. पुराणाश्म युगात माणूस समूह करून राहू लागला. त्यामुळे समूहातील सदस्याबद्दल प्रेम, आपुलकी, जिव्हाळा निर्माण झाला असेल. त्यामुळे आपल्या समूहातील सदस्य मेल्यावर त्याला पूर्वी उघड्यावर फेकून पुढे वाटचाल करत असे. पण सामुहिक जीवनातून निर्माण झालेल्या प्रेमापोटी तो त्याला मृत व्यक्तीला पुरू लागला. काही वेळा मृताला राहणायाच्या ठिकाणी पुरले आहे. यामागे मृत व्यक्तीची कृपा आपल्यावर राहावी ही भावना असावी. 

 

C.नवाश्मयुग :

१.             नवाश्मयुग म्हणजे काय?

“ अश्मयुगाच्या शेवटच्या टप्प्याला ‘नवाश्मयुग’ म्हणतात”

“भारतात इ.स.पु. ६ हजार ते इ.स.पु. १००० या अश्मयुगाच्या टप्प्यास ‘नवाश्मयुग’ असे म्हणतात.”

“शेतीचा शोध, पशुपालन, चाकाचा वापर, भांड्यांची निर्मिती, घर बांधणी, ही मध्याश्मयुगापेक्षा वेगळी व प्रगत अवस्था मध्याश्म युगाच्या शेवटी आली. तिला ‘ नवाश्मयुग’ असे म्हणतात.”

२.              ‘शेतकऱ्यांचे युग’:

       नवाश्मयुगाला ‘शेतकाऱ्यांचे युग’ असे म्हणतात. कारण नवाश्मयुगात मानवाने शेती करायला सुरुवात केली. नवाश्मयुगात वातावरण उबदार झाले. याकाळात लोकसंख्या वाढली. त्यामुळे शिकार व पशुपालन सोडून उदरनिर्वाहाचे साधन शोधणे आवश्यक झाले होते. शेतीचा शोध स्त्रीने लावला. पुरुष पशुपालन व शिकारीसाठी जंगलात गेल्यावर स्त्रीया मुलांना सांभाळण्यासाठी गुहेत राहत असत. भटकंतीच्या काळात गवताची बी जमिनीवर पडल्यावर ती कशी उगवून येते, याचे निरीक्षण केले होते. त्यातून स्त्रीने ती राहत असलेल्या ठिकाणी पहिल्यांदा धान्य उगविले. ही शेतीची सुरुवात होती. म्हणून स्त्रियांना शेतीचे जनक असे म्हणतात.

       शेती करायला लागल्यामुळे मानवाची भटकंती संपली. तो एका जागी स्थिर झाला. मानवी समाज व संस्कृती आकारास येऊ लागली. त्यामुळे शेती करायला सुरु होणे ही एक क्रांतिकारक घटना मानली जाते. त्यामुळे नवाश्मयुगाला ‘शेतकऱ्याचे युग’ असे म्हणतात.

३.             घरे बांधायला सुरुवात:

       शेतीमुळे मानवाला एका ठिकाणी नद्यांच्या सुपीक खोऱ्यात राहणे भाग पडले. त्यामुळे मानवाला घराची आवश्यकता वाटू लागली कारण इथे नद्यांच्या खोऱ्यात नैसर्गिक गुहा नव्हत्या. सुरुवातीची घरे ही माती, गवत व बांबूची बनवलेली असत. ही झोपडी सारखी घरे चौकोनी वा गोलाकार असत.

४.             मातीच्या भांड्यांची निर्मिती-चाकाचा वापर सुरु:

       शेतीत पिकलेले धान्य साठवणे, अन्न शिजवणे, जेवण करण्यासाठी, पाणी साठवण्यासाठी रांजण, पाणी पिण्यासाठी पेले इ. भांड्याची या काळात मोठ्या प्रमाणात निर्मिती झाली.

       नवाश्मयुगात मानवाला चाकाचा शोध लागला. डोंगरावून घरंगळत जाणारा दगड वा लाकडी ओंडका पाहून मानवाला चाकाची कल्पना सुचली असेल. निरीक्षण करून त्याने चाक तयार केले. लवकरच या चाकाचा वापर करून गोलाकार, सुबक व वेगवान भांड्याची निर्मिती केली. ही भांडी अग्नीचा वापर करून भाजली.

५.            कुटुंबसंस्थेचा जन्म :

नवाश्मयुगात मानवी समाजनिर्मितीच्या दृष्टीने पहिले दमदार पाऊल पडले, कुटुंबसंस्थेचा जन्म झाला. या काळात शेती करायला लागल्यामुळे मानव स्थिर झाला, वस्ती करून राहू लागला. त्यातून टोळी अवस्था संपली व कुटुंबसंस्था जन्माला आली. सुरुवातीची कुटुंबसंस्था मातृसत्ताक असावी. कुटुंबसंस्थेतूनच समाज व संस्कृती अस्तीत्वात येऊ लागली.

६.             दैवतांना सुरुवात:

       नवाश्मयुगात धार्मिक कल्पनांचा जन्म झाला. वादळ, वीज, पाऊस याचा अर्थ लोकांना कळत नव्हता. मानव सूर्य, पाणी, जमीन, वनस्पती, बैल यावर अवलंबून होता. त्यांची देव म्हणून पूजा होऊ लागली. याशिवाय मातृदेवतांची पूजा सुरु झाली.

 

===========================================================

 

II.ताम्रपाषाण संस्कृती

 ‘तांबे’ हा मानवाने वापरलेला पहिला धातू होता. तांब्याच्या वापराने ‘ताम्रपाषाण युग’ अस्तित्वात आले. ताम्रपाषाण युग हे नवाश्मयुगापेक्षा प्रगत अवस्था होती.

१.    ‘ताम्रपाषाण संस्कृती’ म्हणजे काय?

‘भूतकाळातील ज्या कालखंडात मानव तांब्याची हत्यारे व अवजारे वापरत होता, तसेच तांब्यासोबत दगडाची हत्यारे व अवजारेही वापरत होता, त्या काळाला ‘ताम्रपाषाण युग’ असे म्हणतात दगड व तांबे यांची हत्यारे व अवजारे एकत्रित वापरल्याने जी संस्कृती अस्तित्वात आली तिला ‘ताम्रपाषाण संस्कृती’  असे म्हणतात.

ताम्रपाषाण संस्कृतीचे अवशेष देशभर सापडत असले तरी प्रामुख्याने तीन ठिकाणे आहेत जी अत्यंत महत्वाची आहेत. ‘बनास संस्कृती’-राजस्थान, ‘माळवा संस्कृती’- मध्यप्रदेश, ‘जोरवे संस्कृती’-महाराष्ट्र यांचा समावेश होतो.

२.    अधिक धान्योत्पादन करायला सुरुवात :

ताम्रपाषण युगातील लोक गव्हू, तांदूळ, बाजरी, मसूर, उडीद, मुग, इ. पिके घेत असावेत. या सर्व धान्याचे अवशेष सापडतात. विशेषत: महाराष्ट्रातील नर्मदा नदीच्या तिरावरील ‘नवदातोली’ या ठिकाणी वरील सर्व पिकांचे अवशेष सापडले आहे. यावरून ताम्रपाषाण युगात नवाश्मयुगापेक्षा अधिक धान्योत्पादन करायला सुरुवात केल्याचे दिसून येते. (का?)एकतर ताम्रापाषण युगात लोकसंख्या वाढली, वाढत्या लोकसंख्येला अधिक धान्य उत्पादन करण्याची गरज होती. अधिक उत्पादन करणे तांब्याची हत्यारे व अवजारे वापरल्यामुळे शक्य झाले.

ताम्रपाषाण युगात महाराष्ट्रातील काळ्या रेगुर मातीत कापसाची लागवडही केली जात होती. कापसापासून कापड तयार करण्याचे तंत्र या लोकांना अवगत होते.

३.    छोटी-मोठी गावे वसायला सुरुवात :

नवाश्मयुगात मानव शेती करायला लागला. त्यामुळे त्याला एका जागी स्थिर राहणे भाग पडले. आता माणसाला नदीच्या खोऱ्यात शेताजवळ राहण्यासाठी घर बांधणे भाग पडले. एका जागी स्थिर होऊन घरे बांधून राहिल्यामुळे ठिकठिकाणी वस्त्या निर्माण झल्या. या वस्त्यांचे ताम्रपाषाण युगात रुपांतर छोट्या गावात व्हायला लागले. ताम्रापाषण युगातील ‘सर्वात मोठी वस्ती’ महाराष्ट्रातील ‘दायमाबाद’ येथे सापडली आहे. ही वस्ती जवळजवळ २० हेक्टर जागेत आहे. या ठिकाणी जवळजवळ ४००० लोक राहू शकतील एवढा मोठा या वस्तीचा आकार आहे. हे एक मोठे गाव असावे. तसेच या गावाच्या मध्ये एक किल्ल्यासारखी इमारत सापडली आहे. या ठिकाणाहून गावाचे प्रशासन चालत असावे.

अशा तऱ्हेने ताम्रापाषण काळात धान्याचे उत्पादन वाढल्यामुळे छोटी-मोठी गावे अस्तित्वात येऊ लागली.

४.    विविध व्यवसायांचा उदय :

ताम्रपाषाण युगात लोक शेती हा प्रमुख व्यवसाय होता त्याचबरोबर धातुकाम, कापडनिमिती, मातीची भांडी बनवणे, इ, विविध व्यवसायांचा उदय या काळात झाला. जीवनावश्यक वस्तू तयार करणारे व शेतीसाठी लागणाऱ्या वस्तू बनवणारे विविध व्यवसाय उदयास आले.

५.   दफनविधी व धार्मिक जीवन :

महाराष्ट्रातील जोरवे या ठिकाणी मृत व्यक्तीला एका मातीच्या कलशात घालून घरात पुरले आहे, यावरून मृत व्यक्तीची कृपा व त्याचा सहवास मिळावा अशी त्यामागे भावना असावी. मृत व्यक्तीला पुरताना त्याच्यासोबत त्याला उपयोगी पडणाऱ्या वस्तूसुध्दा पुरल्या आहेत. त्यावरून या लोकांचाही ‘मृत्यूनंतरच्या जीवनावर विश्वास’ असावा असा निष्कर्ष काढता येतो.

याकाळात  ‘मातृदेवता’ व ‘वृषभ’ यांची पूजा करत असावेत. आजच्या काळात आपण जो बैलपोळा साजरा करतो त्याची ही सुरुवात होती असे म्हणता येईल.   

 याकाळात घरांच्या बांधणीवरून व मृतदेहाच्या सोबत पुरलेल्या वस्तूंच्यावरून सामाजिक विषमता दिसू लागली: 

No comments:

Post a Comment

Featured Post

previous year question papers

http://www.unipune.ac.in/university_files/old_papers.htm

Popular Posts