Sunday 28 August 2022

H. औरंगजेबाचे दक्षिण भारत धोरण

 H. औरंगजेबाचे दक्षिण भारत धोरण

 

शहाजहानच्या कारकिर्दीत औरंगजेब दक्षिणचा सुभेदार होता. दक्षिण भारतात विजापूर व गोवळकोंडा ही प्रमुख मुसलमानी राज्ये होती. त्यांना नष्ट करण्याचे त्याचे धोरण होते. पण या दोन्ही राज्यांपेक्षा खरी काळजी शिवाजीची होती. विजापुरकरांशी शिवाजी महाराजांशी संघर्ष चालू असताना औरंगजेबाने शाहिस्तेखानास सैन्य घेऊन पाठविले. पुण्यास शाहिस्तेखान असतानांच शिवाजीने हल्ला करुन शाहिस्तेखानची बोटे कापली. सुरत ही मोगलांची व्यापारपेठ लुटून अमाप संपत्ती नेली. यानंतर आलेल्या राजा जयसिंगाने सर्व बाजूंनी नाकेबंदी करुन शिवाजीस पुरंदर येथे शरण आणले. एवढेच नव्हे तर शिवाजी आग्र्यास औरंगजेबाच्या भेटीस दाखल झाला. त्यानंतर शिवाजी आगऱ्याहून निसटून स्वदेशी सुखरुप परत आला. पुन्हा सुरत बागलाण, खानदेश व वऱ्हाड या मोगली मुलखावर स्वाऱ्या केल्या. पुरंदरच्या तहात गेलेला सर्व मुलूख परत मिळविला. इ.स. १६८० मध्ये शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला. १ एप्रिल १६८२ रोजी औरंगजेब दक्षिण भारत जिंकण्यासाठी बुऱ्हाणपुरास दाखल झाला.

 

१.      विजापूर जिंकले (इ.स. १६८६)

विजापूरची सुत्रे यावेळी शरझाखान नावाच्या प्रधानच्या हाती होती. राजपुत्र अझमच्या नेतृत्वाखाली विजापूर शहराला वेढा देण्यात आला. विजापूरला संभाजी व गोवळकोड्यांला कुतुबशहा यांचे साह्य होते. विजापूर लवकर हाती येत नाही म्हणून औरंगजेबाने स्वतः इ.स. १६८६ मध्ये वेढा निकराने चालू केला तेव्हा सुलतान सिंकदर याने औरंगजेबाकडे शरणागती पत्करली. त्यास खान हा किताब देऊन दरसाल एकलाखाचे निवृत्ती वेतन देण्यात आले. सुलतानच्या बहिणीचा राजपूत आझमशी विवाह करुन देण्यात आला.

 

२.      गोवळकोंड्यावर स्वारी (१६८७)

विजापूरच्या विजयानंतर इ.स. १६८७ मध्ये औरंगजेब गोवळकोंड्याकडे वळला. याठिकाणी अबुल हसन गादीवर होता. त्याचा सर्व कारभार मादण्णा व आक्काण्णा या दोन हिंदू मुत्सदी पुरुषांकडे होता. मीर मोहमंद इब्राहीम हा गोवळकोंड्याचा सेनापती फितूर झाल्यामुळे सुलतानने शरणागती पत्कारली. मादण्णा व आक्काण्णा यांना ठार करण्यात आले. गोवळकोंड्याचा किल्ला ताब्यात आल्यावर सुलतान अबूल हसनला बंदी करुन दौलताबादच्या किल्ल्यावर पाठविण्यात आले. या विजयामुळे औरंगजेबास सात कोट नगद व अमाप सोने मिळाले.

३.      मराठ्यांशी युध्द

विजापूर व गोवळकोंडा विजयानंतर औरंगजेबाने आपले सर्व लक्ष मराठ्यांकडे वळविले. छत्रपती संभाजीच्या विरुध्द त्याने आपल्या फौजा पाठवून संभाजी महाराज व त्याचा मित्र कवी कलष हे मोठ्या प्रयत्नाने त्यांच्या तावडीत सापडले. इ.स. १६८९ मध्ये औरंगजेबाने त्यांना हालाहाल करून ठार मारले. संभाजी महाराजांच्या पश्चात त्याचा धाकटा भाऊ राजाराम याने इ.स. १७०० पर्यंत मराठ्यांचे नेतृत्व नेटाने केले. महाराष्ट्र बाहेर कर्नाटकात जिंजी येथे तो गेला. संताजी घोरपडे, धानाजी जाधव, रामचंद्र आमात्य, प्रल्हाद निराजी व खंडोबल्लाळ इ. त्याच्या सरदारांनी मोगल सैन्याचा प्रतिकार केला. राजारामाच्या मृत्युनंतर त्याची पत्नी ताराबाई हिने आपल्या अल्पवयीन मुलाच्या वतीने राज्यकारभाराची सुत्रे हाती घेऊन १७०७ औरंगजेबाच्या मृत्युपर्यंत मोगल सैन्याचा प्रतिकार यशस्वीपणे केला. २७ वर्षपर्यंत चालणाऱ्या या संघर्षात औरंगजेबास शेवटपर्यंत यश आले नाही.

====================================



No comments:

Post a Comment

Featured Post

previous year question papers

http://www.unipune.ac.in/university_files/old_papers.htm

Popular Posts