Sunday 31 July 2022

सातवाहन घराणे- गौतमीपुत्र सातकर्णी

D सातवाहन घराणे (Satvahan Period)
 
मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासानंतर उत्तर भारतात शुंग, कण्व, कुशाण घराण्यांचा उदय झाला तर दक्षिण भारतात ‘सातवाहन’ किंवा ‘आंध्र’ घराण्याचा उदय झाला. सातवाहन घराण्याची सत्ता इ. स. पु. २३० ते इ. स. २३० अशी जवळजवळ ४५० वर्षे द. भारतात होती. हे घराणे महत्वाचे होते कारण -
i. हे महाराष्ट्रातील पहिले महत्वाचे घराणे होते.
ii. हे महाराष्ट्रातील पहिले राज्य निर्माते होते.
iii. यांच्या काळात मराठी भाषा, मराठी संस्कृती याला आकार यायला सुरुवात झाली.
१. सातवाहन मुळचे कोण?
सातवाहन मुळचे कोण याबद्दल विद्वानांमध्ये मतभेद आहे. सातवाहनांची दोन नावे साधनांमध्ये येतात. अ. आंध्र किंवा आंध्रभृत्य ब. सातवाहन त्याचा अर्थ खालीलप्रमाणे सांगता येईल.
अ. ‘आंध्र किंवा आन्ध्रभृत्य’ :
पुराणामध्ये सातवाहनांचा उल्लेख ‘आंध्र’ किंवा ‘आंध्राभृत्य’ असा येतो. त्याचा अर्थ,
i. प्राचीन काळात ‘आंध्र’ नावाची जमात होती तीच पुढे राज्यकर्ते सातवाहन झाले
ii.किंवा आन्ध्र राजांचे सातवाहन सेवक असावेत किंवा
iii.सातवाहन राजांचे चे आंध्र सेवक असावेत.
iv.काही इतिहासकार म्हणतात कि, सातवाहन मुळचे आंध्रप्रदेशातील असावेत. नंतर ते महाराष्ट्राचे राज्यकर्ते झाले असावेत. पण सातवाहनांचे सुरुवातीचे शिलालेख महाराष्ट्रात सापडतात त्यामुळे सातावाहानाचे मुळ स्थान महाराष्ट्रातील असावे.
३. सातवाहन काळातील राजकीय जीवन : थोडक्यात :
ब. सातवाहन :
काही इतिहासकारांच्या मते, i. सातवाहन सूर्याचे उपासक होते, सूर्याच्या रथाला सात घोडे असतात. त्यामुळे या सुर्योपासक घराण्याला ‘सातवाहन’ असे नाव पडले असावे.
ii. सातवाहनांच्या मुळ पुरुषाचे नाव सातवाहन होते. त्यामुळे या घराण्याचे नाव सातवाहन पडले.
वरील चर्चेवरून हे स्पष्ट होते कि, सातवाहन हे मूळ महाराष्ट्रातील होते. प्रतिष्ठान(पैठण) ही सातवाहनांची दीर्घकाळ राजधानी होती.
 
२. सातवाहनांचा पहिला राजा : सिमुक-
सिमुक (शिमुक,शिन्धुक) हा सातवाहन साम्राज्याचा संस्थापक मानला जातो. सातवाहनाच्या उदय काळात त्यांना शकांच्या आक्रमणाचा सामना करावा लागला. त्यांनी सातवाहनाना पराभूत करून महाराष्ट्रात वर्चस्व मिळवले. सातवाहन घराण्यात अनेक राजे होऊन गेले. मात्र या सर्वात गौतमीपुत्र सातकर्णी हा सर्वात पराक्रमी राजा होऊन गेला.
 
३. गौतमीपुत्र सातकर्णी (इ.स. १०६-१३०):
सातवाहन घराण्यातील सर्वश्रेष्ठ राजा गौतमीपुत्र सातकर्णी होता. त्याने आपल्या अंगभूत पराक्रमाने सातवाहन राज्याचा विस्तार केला. गौतमीपुत्राच्या काळात सातवाहन राज्य तत्कालीन भारतातील एक प्रभावशाली राज्य बनले. गौतमीपुत्र सत्तेवर आला त्यावेळी सातवाहनांचा बराचसा भूभाग शक राजांनी जिंकला होता. तेंव्हा गौतमीपुत्रासमोर शक हेच प्रमुख आव्हान होते. त्याने प्रथम शकांशी युद्ध केले.
 
i.शकांचा पराभव :
गौतमिपुत्राने शक जमातीच्या क्षहारात घराण्याचा पराभव केला. पराभूत क्षहरात राजा नहपान याची ८००० चांदीची नाणी सापडली आहेत. या नाण्यावर गौतमीपुत्राची मुद्रा पुन्हा उमटवली आहे. यावरून गौतमिपुत्राने शकांचा पराभव केला हे स्पष्ट होते.
ii.माळवा जिंकला:
शकांचा पराभव केल्यानंतर गौतमीपुत्र सातकर्णी याने माळवा(आजचा मध्य प्रदेश) जिंकला. त्यामुळे सातवाहन राज्याचा विस्तार मध्य भारतातही झाला.
iii. शक-यवन-पहलव-निशुदन :
गौतमीपुत्राच्या शिलालेखात त्याने ही पदवी घेतली आहे. त्याचा अर्थ शक, यवन म्हणजे ग्रीक आणि पल्लव यांचा पराभव करणारा असा होतो.
iv. त्रिसमुद्रतोयपितवाहन :
नाशिक येथे एक शिलालेख गौतमिपुत्राच्या आईने कोरला आहे. त्यात तिने ही पदवी आपल्या मुलासाठी कोरली आहे. त्याचा अर्थ ज्याचे घोडे तिन्ही समुद्रांचे पाणी प्याले आहेत तो, असा होतो. म्हणजे त्याची सत्ता तीन समुद्राच्या मधल्या भागात म्हणजे दक्षिणापथात चालत असावी.
 
४. वाशिष्टीपुत्र पुलुयामी :
                               गौतमीपुत्र सातकर्णी नंतर वाशिष्टीपुत्र सत्तेवर आला. त्याची नाणी आंध्र प्रदेशात सापडल्याने त्याचे आंध्र भागावर वर्चस्व होते. हे स्पष्ट होते. त्याच्या काळात शक-सातवाहन संघर्ष पुन्हा उफाळून आला. शक राजा रुद्रदामन पहिला याने सातवाहनांचा दोनदा पराभव केला. परंतू सातवाहनांशी विवाहसंबध असल्याने त्यांचे राज्य नष्ट केले नाही.
 
५. यज्ञश्री सातकर्णी : 
या राज्यकर्त्याने शकांडून कोकण, माळवा हे प्रदेश जिंकून घेतले. त्याला समुद्र संचार व व्यापारात रस होता. त्याच्या नाण्यांवर शिडाच्या जहाजाच्या प्रतिमा आहेत. त्यावरून ही गोष्ट स्पष्ट होते. यज्ञश्री नंतर सातवाहन सत्तेला उतरती कळा लागली. इ.स. तिसऱ्या शतकात सातवाहन सत्तेला साम्राज्याचा ऱ्हास झाला.


Featured Post

previous year question papers

http://www.unipune.ac.in/university_files/old_papers.htm

Popular Posts